
पृथ्वीवर दर वर्षी दहा लाख चौरस किलोमीटर या गतीने जमीन उजाड होत आहे ही गंभीर गोष्ट समजली असे वाचकाला वाटेल. यात, अशाश्वत शेती पध्दती हे वाळवंटीकरणाचे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे.
मानवी जीवनासाठी हे हानिकारक आहे असे म्हटल्यानेही याचे खरे गांभीर्य स्पष्ट होत नाही. ही अस्तित्व गमावण्याची प्रक्रिया आहे हे सत्य सतत दडवण्यात येते.
औद्योगिकरण आणि शहरीकरण हातात हात घालून पुढे जाते. अर्थव्यवस्था यावरच अवलंबुन असते. मात्र असे अहवाल या त्रयीवर बोट ठेवत नाहीत. मोटार, वीज, सीमेंट व इतर हजारो कृत्रिम वस्तुंचे जग म्हणजे ज्याला जीवनमानाचा दर्जा किंवा विकसित जीवनशैली म्हटले जाते ती प्रत्यक्षात न टिकणारी, impracticable, अशाश्वत गोष्ट आहे. रासायनिक – यांत्रिक आधुनिक शेती केवळ अशाश्वत नाही तर ती ज्याचा अविभाज्य भाग आहे ते औद्योगिकरण, मानवजात व जीवसृष्टीचे झपाटय़ाने उच्चाटन घडवत आहे ही गोष्ट ठरवून लपवली जात आहे.
दि. १ डिसेंबर २०२४ रोजी, लंडनच्या गार्डियनमधे प्रसिद्ध झालेला सोबतचा अहवाल पहा.👇👇https://www.theguardian.com/environment/2024/dec/01/land-degradation-expanding-by-1m-sq-km-a-year-study-shows

असे अहवाल देणाऱ्यांचा उल्लेख शास्त्रज्ञ म्हणून होत असला तरी ते हत्तीला चाचपणाऱ्या आणि त्याचा अंदाज बांधणाऱ्या सात आंधळ्यांपेक्षा वेगळे नाहीत.
यामुळे असे अहवाल वाचून देखील मानवजात गाफील आहे. या वाळवंटीकरणाला महाविस्फोटक तापमानवाढीशी व ती घडवणाऱ्या औद्योगिकरणाशी असलेल्या संबंधाचा उल्लेख टाळून तिला गाफील ठेवले जात आहे. मानवजातीने हे समजून घेतले पाहिजे की आपले अस्तित्व हे स्वतःला आधुनिक म्हणवणाऱ्या मानवाच्या कर्तृत्वाने मिळाले नाही. औद्योगिकरणामुळे कुणीही जगत नाही उलट त्यामुळे तो नष्ट होत आहे व निसर्गाधारित जीवन जगणाऱ्या निरपराध मानवांना आणि इतर जीवसृष्टीला फक्त वीस ते पंचवीस वर्षांत नष्ट करत आहे. हे सांगणे हा कुठला आदर्शवाद नसून परखड वास्तव आहे.
मानवजातीच्या रक्षणासाठी तात्काळ उद्योगपूर्व, शाश्वत शेतीआधारित गावांच्या पध्दतीकडे जाणे यात कोणताही मागासपणा नाही. त्यात या एकमेव ग्रहाने दिलेल्या जीवनाच्या अदभूत देणगीचा आदर आहे.
-ॲड. गिरीश राऊत
निमंत्रक,भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
