
वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे दलित वस्तीसह काही वॉर्डांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दामले फैल या वॉर्डात सध्या देखील केवळ संध्याकाळी ६ ते ७ या अवघ्या एका तासापुरता पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येत आहे.
वास्तविक, उन्हाळ्याच्या काळात नागरिकांनी पाणीटंचाईला तोंड दिलेच होते, पण आता पावसाळ्यातही तीच परिस्थिती कायम आहे. अनेक दिवसापासून दामले फैलातील सार्वजनिक बोर बंद असल्याने नागरिकांना ग्रामीण भागातील लिकेज मोट्या पाईपलाइनमधून पाणी आणावे लागत आहे. नळ धारक गरोदर महिलांना व शेकडो महिला आणि पुरुष उन्हाच्या कडाक्यात रांगेत उभे राहून पाणी भरत होते परंतु नगर पालिकाचे अधिकाऱ्यांना जाग आली नाही. आजही त्याच ठिकाणिऊन पाणी आणावे लागत आहे.
या वस्त्यातील समाजवर अन्याय होत असून त्यामुळे त्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ही वार्ड दलित वस्ती अंतर्गत येत असूनही आवश्यक पायाभूत सुधारणा होताना दिसत नाहीत.
दुसरीकडे, शहरातील श्रीमंत भागांमध्ये मात्र एक दिवस आड नियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
दामले फैल वॉर्डामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कोणतेही मूलभूत विकासकाम झाले नसून, ना पालिकेचे अधिकारी या भागाची पाहणी करतात ना समस्यांकडे गांभीर्याने पाहतात. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, वणी नगर पालिका प्रशासक अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून या समस्यांचे निराकरण करावे. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि स्ट्रीट लाईट यासारख्या सेवांची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारांची माहिती असलेले फलक वॉर्डात लावण्यात यावेत. अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

