
वणी (प्रतिनिधी): वणी शहराजवळील निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट लांबीचे कठडे तुटल्याने तसेच पुलालगत काही ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा मार्ग मुकुटबन तसेच तेलंगणा राज्याला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर अवजड व हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच मार्गावरून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पालक दुचाकीने नियमित ये-जा करतात. पुलालगत असलेल्या गणेशपूर परिसरातील छोरिया लेआउटसह अनेक निवासी वसाहतींतील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. मात्र नदी पुलावरील तुटलेले कठडे आणि रस्त्यावरील मोठे खड्डे यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

यापूर्वीही या पुलावर ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली असून, अवजड वाहनांचे संतुलन बिघडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम काही ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सा.बा.) अधिकाऱ्यांनी या धोकादायक परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन पुलावरील तुटलेल्या कठड्यांची दुरुस्ती करावी. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम, गिट्टी आदी साहित्य टाकून तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मोठी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पुलाची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
