
देवाळा (ता. मारेगाव) – “बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे,” या प्रेरणादायी विचारातून समाज प्रबोधनाचे आवाहन करत विचारवंत, लेखक व प्रकाशक दत्ता डोहे यांनी मनुवादी व्यवस्थेवर तीव्र टीका केली.
मारेगाव तालुक्यातील देवाळा गावात आयोजित एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
डोहे म्हणाले, “देशात सध्या मनुवादी विचारसरणीने थैमान घातले असून सत्तेचा गैरवापर करून जाती-धर्माच्या पलीकडील घटकांचे शोषण होत आहे. अगदी देशाच्या मा. सरन्यायाधीशांचा अपमान करण्यापर्यंत ही व्यवस्था पोहोचली आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे समाज प्रबोधन. बुद्ध, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मानवतेचा मार्गच आपल्याला स्वीकारावा.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डी. एस. खोब्रागडे (नागपूर), राजूभाऊ निमसटकर, डी. डी. गोंदाने (नागपूर) आणि जगदीश भगत (कर सहाय्यक, चंद्रपूर) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भगत यांनी केले, तर समस्त देवाळा ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमातून बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभावी संदेश समाजात पोहोचविण्यात आला.
