
वणी (प्रतिनिधी): खंडोबा वाघोबा देवस्थान ट्रस्ट, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणी, धनगर समाज अधिकारी-कर्मचारी संघटना वणी आणि राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार व प्रबोधन मेळावा वणी येथील खंडोबा वाघोबा देवस्थान सभागृहात संपन्न झाला.

या प्रसंगी प्रसिद्ध लेखक व विचारवंत होमेश भुजाडे (नागपूर) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात गरिबी, बेरोजगारी, असंख्य सामाजिक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे आणि समाजाचे प्रश्न जगासमोर मांडणारे साहित्यिक निर्माण होणे ही काळाची गरज आहे. आधुनिक शिक्षणासोबत मुलांनी वाचन आणि लेखनाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग पंडिले (अध्यक्ष – खंडोबा वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, वणी) होते. विशेष अतिथी म्हणून सुनील पोराटे (सचिव – धनगर समाज सेवा मंडळ, चंद्रपूर), जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भुजाडे, तर प्रमुख अतिथी म्हणून अशोक सुर, देविदास बोबडे, राजेंद्र कोरडे, प्रतिभा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रसंगोचित मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात होमेश भुजाडे लिखित “मातोश्री अहिल्याबाई — महिला सक्षमीकरणाच्या आद्य प्रवर्तक” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात ४५ गुणवंत विद्यार्थी आणि ११ सेवानिवृत्त समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत ऐतिहासिक व्यक्तींची भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री वैद्य, धनंजय उरकुडे आणि भाऊराव मत्ते यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष खुजे व गौरव उगे, प्रास्ताविक विलास शेरकी, पाहुण्यांचा परिचय रघुनाथ कांडरकर, तर आभार प्रदर्शन राजेश निरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काशिनाथ बुच्चे, डॉ. श्रीकांत भगत, डॉ. मधुकर आस्कर, दिवाकर घोरुडे, राम झिले, राजकुमार बोबडे, संजय चामाटे, विलास गवारकर, सूर्यभान चिडे, श्रीकांत कालर, नितीन वैद्य, काशिनाथ पचकटे, सुरेंद्र बुच्चे, विकास चिडे यांनी परिश्रम घेतले.
