
वणी (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील मौजे उकणी खंड-1 येथील उर्वरित 15 टक्के जमीन संपादित करून गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नागपूर येथील वेकोलि (WCL) मुख्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सेफ्टी बोर्ड सदस्य तथा काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी भेट दिली.
यावेळी संजय खाडे यांनी उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या न्याय्य मागण्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. “प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यानंतर एचएमएस युनियनचे अध्यक्ष शिवकुमार यादव, सचिव शरद धांडे, संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीत सीएमडी हेमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठित करून येत्या 15 दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल व जमीन संपादनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर संघर्ष समितीने साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
