
नवी दिल्ली, दि. २४ जुलै : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. २४ जुलै) पत्रकार परिषद घेऊन २० जुलै रोजी दिल्लीतील शांततापूर्ण आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या १९ वर्षीय साहिल या विद्यार्थ्याची भेट घेतली. यावेळी त्यांनी साहिलच्या शरीरावरील जखमा प्रसारमाध्यमांना दाखवत या घटनेबाबत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले.
राहुल गांधी यांनी सांगितले की, साहिल हा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असून कुटुंबाला आधार देण्यासाठी अर्धवेळ कार चालक म्हणून काम करतो. २०२५ मधील एसएससी दिल्ली कॉन्स्टेबल भरती पेपर लीक प्रकरणाचा तो पीडित असल्याचा दावा त्यांनी केला. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी तो शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाला होता, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी दावा केला की, आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी पेलेट गनचा वापर केल्यामुळे साहिलच्या एका डोळ्याची दृष्टी कायमची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत, “देशातील विद्यार्थ्यांवर झालेल्या या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवावे,” अशी मागणी केली.
पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा, पारदर्शक भरती प्रक्रियेचा आणि उत्तरदायी प्रशासनाचा मुद्दा उपस्थित करत, विद्यार्थ्यांच्या आवाजाचे दमन होऊ नये, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.
