▪️ मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर..

कोरपना (प्रतिनिधी): गणराज्य दिनाच्या राष्ट्रीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता तसेच त्यांचा फोटो वगळून करण्यात येणाऱ्या अवमानास आळा घालावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी कोरपना तालुक्यातील मौजा गाडेगाव (विरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच, सचिव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी गणराज्य दिनाचे मानकरी व संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न ठेवल्याचा प्रकार घडला. ग्रामस्थ सौ. करमनकरताई यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधितांनी “आम्ही कधीच फोटो ठेवत नाही, बाबासाहेबांचा फोटो ठेवण्याची आवश्यकता नाही,” अशी बेजबाबदार व अरेरावीची उत्तरे दिल्याने राष्ट्रीय नेत्यांचा जाणीवपूर्वक अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर येथेही असा प्रकार घडल्याबाबत पोलीस स्टेशन गडचांदूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राज्यातील मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता केलेल्या वक्तव्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यातील अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा, खासगी संस्था, कॉन्व्हेंट, निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी २६ जानेवारीच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान सर्रासपणे होत आहे. ही बाब जातीयवादी मानसिकता व असंवेदनशीलतेचे द्योतक असून, यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे संविधानकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानास आळा घालून दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र) चे राज्य चिटणीस अशोककुमार उमरे, तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, शिक्षण बचाव समन्वय समितीचे हरिदास गौरकार, तालुका सरचिटणीस गौतम धोटे, संपादक दिनेश झाडे (पिपरी), रविदास करमनकर, वनिता चतुरदास चंद्रागडे, मनोज महेंद्र हस्तक, पत्रकार मेघराज हरबडे, दिगंबर धोटे, शेषराज शिलारकर, संजय डोमाजी पाटील, सुनील खारकर, संजोग चरणदास धोटे, धनराज जिवने आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सादर केले.
