
गुरुकुंज आश्रम, मोझरी – अनेक आंदोलने घडविणाऱ्या पवित्र भूमीवर, प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा, दिव्यांग जनतेचे तारणहार व माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, बेरोजगार, कामगार अशा विविध घटकांच्या न्यायहक्कांसाठी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असून, पंजाबमधील शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
आज दि. 12 जून रोजी संभाजी ब्रिगेडनेही या आंदोलनाला ठाम पाठिंबा देत आपली एकजूट दाखवली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमाताई बोके, मराठा सेवा संघाचे अरविंदजी गावंडे, प्रदेश प्रवक्ते प्रेमकुमार बोके, अजय धोबे, गजानन भोयर, आशिष रींगोले, शंकरराव पूनवटकर, राजू ताजने, भाऊसाहेब आसुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर दि. 14 जून 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले असून, वणी शहरातही संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण बंद पाळण्यात येणार आहे. ही माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी दिली.
शासनाने त्वरित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांच्या मागण्या आणि इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा हा जनआक्रोश अधिक तीव्र होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
