
नवी दिल्ली – न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी शपथ घेतली.
न्यायमूर्ती गवई हे भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा राहणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर ज्येष्ठतेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.
या शपथविधीप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी १९८५ मध्ये वकिली सुरू केली आणि २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. त्यांनी सुमारे ७०० खंडपीठांमध्ये काम करत विविध क्षेत्रांतील (संवैधानिक, फौजदारी, पर्यावरण, इ.) महत्त्वाचे निर्णय दिले आहेत.
भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी उलानबाटार (मंगोलिया), न्यू यॉर्क (यूएसए), कार्डिफ (यूके) आणि नैरोबी (केनिया) येथे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला आहे. तसेच त्यांनी कोलंबिया आणि हार्वर्ड विद्यापीठात व्याख्याने दिली आहेत.
शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, निवृत्तीनंतर ते राजकारणात प्रवेश करणार नाहीत. तसेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणे हे सौभाग्याचे व अभिमानाचे क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील देण्यात आली.
