लेखक – दत्ता डोहे, वणी (जि. यवतमाळ)

माझा नुकताच कोकण दौरा झाला. त्यात संगमेश्वरला भेट दिली, आणि तिथं उभं राहून काळाच्या पडद्याआड गेलेल्या, पण अजूनही थरारून सोडणाऱ्या घटनांची आठवण झाली. हेच ठिकाण – जिथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना इकलास खानानं अटक केली होती. पण आज त्या ऐतिहासिक वाड्यांची अवस्था? पूर्णतः जीर्ण, पडकी आणि उपेक्षित.
हीच गोष्ट महाराष्ट्रभर विखुरलेल्या संस्कृतीच्या स्मारकांची. कोल्हापूरचं “संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह” हे दुसरं उदाहरण. कोल्हापूर सारख्या सांस्कृतिक नगरीत एक महत्वपूर्ण वास्तू जळून गेली, आणि आजही तिच्या दुरुस्तीसंदर्भात कोणतीही ठोस माहिती नाही. नाट्यगृह नष्ट झालं, पण त्याची आठवणही पुसली जाईल की काय, अशी भीती वाटते.
महाराष्ट्रातले गड, किल्ले, बुद्ध स्तूप, सांस्कृतिक वास्तू आणि प्रेरणास्थळं ही आपल्या अस्मितेची चिन्हं आहेत. परंतु आज ती झपाट्याने नष्ट होत चालली आहेत. औरंगाबाद, भंडारा, नागपूर, अहमदनगर अशा भागांतील बौद्ध स्थळांवर आज मंदिरं झालेली आहेत, आणि तिथे धार्मिक जातीयवादाचा गंध जाणवतो. महापुरुषांच्या स्मृतींवर काही मंडळींचा केवळ राजकीय अधिपत्याचा हक्क राहिलाय.
याहून वाईट म्हणजे, या महापुरुषांनी ज्यांच्यासाठी जीवन समर्पित केलं, त्या बहुजन समाजाचे नेतेही याकडे डोळेझाक करत आहेत. त्यांना आपल्या समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक ठेव्याशी काही देणं-घेणं उरलेलं नाही. स्मारकांच्या जागा, त्यांच्या माध्यमातून मिळणारा राजकीय लाभ – इतकंच त्यांना महत्त्वाचं वाटतं.
अँड. एकनाथराव साळवे, बॅ. खोब्रागडे, शांतिनिकेतनचे पी. बी. पाटील, कॅ. भाई काळे यांच्यासारख्या झपाटलेल्यांच्या कार्याची दखल आज कुणी घेत नाही.
या सगळ्या घटनांतून एकच प्रश्न निर्माण होतो – हे सर्व कोण जपणार?
हे फक्त सरकारकडून होणार नाही. हे काम समाजातील संवेदनशील, जागृत नागरिकांनी हाती घेतलं पाहिजे. प्रेरणादायी वास्तू, व्यक्तिमत्त्वं, चळवळी – यांचा दस्तऐवज तयार केला पाहिजे. नव्या पिढीला हा वारसा सांगितला पाहिजे.
आज गरज आहे ती, केवळ अभिमानाने स्मरण करण्याची नव्हे, तर त्या स्मरणातून कृतीत उतरवण्याची. स्मारकं, परंपरा आणि विचार – हे जिवंत ठेवणं, म्हणजे आपली ओळख, आपली अस्मिता जिवंत ठेवणं.
