
वणी (प्रतिनिधी) – सध्या वणी विभागातील अधिकृत रेती घाट बंद असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती तस्करी उघडपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना घरबांधणीसाठी रेती उपलब्ध होत नसताना, घर कुलच्या नावाखाली दिवसाढवळ्या ट्रकने अवैध रेती बिनधास्त शहरात आणली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दिनांक २० जून रोजी सायंकाळी ४:३० वाजता शेतकरी मंदिर समोर, घर कुलसाठीच्या नावाखाली आलेल्या एका हायवा ट्रकद्वारे सुमारे ६ ब्रास रेती रस्त्यावर थेट टाकण्यात आली. विशेष म्हणजे ही रेती प्रकरण सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या समोर करण्यात आली असून, ट्रक चालकाने रुग्णवाहिका व इतर वाहने थांबवून रस्त्यावरच धाक निर्माण केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही रेती अंदाजे ₹९,००० प्रति ब्रास दराने, ₹५४,००० इतक्या रकमेची विकली गेली.
शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असूनही अशा प्रकारे खुलेआम अवैध रेती तस्करी होणे, हे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. हे कॅमेरे सामान्यांच्या सुरक्षेसाठी आहेत की अवैध धंद्याच्या सुरक्षेसाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शक्यताच
दरम्यान, वणी परिसरातील नद्यांमधून रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन सुरू असून, त्यामुळे पाण्याची पातळी कमी होऊन भविष्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. ट्रकद्वारे होणाऱ्या अवैध रेती वाहतुकीवर तत्काळ बंदी आणावी आणि जप्त केलेली रेती गरजू घर कुल धारकांना अधिकृतपणे उपलब्ध करून द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.
आता वणीकरांचे लक्ष प्रशासनाच्या कृतीकडे लागले आहे – काय कारवाई होणार, की पुन्हा एकदा दुर्लक्षच होणार?

