
वणी/ यवतमाळ – भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, मतचोरी व गैरमार्गाने सत्ता मिळवली असून, हा केवळ राजकीय विषय नसून सर्वसामान्य मतदारांच्या मतदानाच्या हक्काचा सरळ अपमान आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून केला. राहुल गांधींनी मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या अन्यायाविरुद्ध तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
त्याअंतर्गत, दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ७:३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, यवतमाळ येथे “मतदान चोर, खुर्ची सोड” या घोषणेसह भव्य कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार, आमदार, माजी खासदार/आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, सर्व आघाडी संघटना व सेलचे नेते/पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन प्रदेश सचिव संजय रामचंद्र खाडे यांनी केले आहे.
“लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांच्या हक्कासाठी लढा — सामील व्हा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा!”
