▪️ खासगी दवाखान्यांवरील जनतेचा विश्वास उडाला. .

वणी प्रतिनिधी : वणी तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. शहरातील काही खासगी दवाखान्यांमधील छोट्या उपचार पद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून या दवाखान्यांवरील विश्वास डळमळीत झालेला दिसत आहे.
या गैरव्यवस्थेमुळे तालुक्यातील शेकडो रुग्ण दररोज अगदी छोट्या व अन्य उपचाराकरिता देखील वरोरा व चंद्रपूर येथे धाव घेतात. तेथील उपचारानंतर अल्प खर्चात व जलद प्रकृती सुधारते, असे रुग्ण सांगतात.
दरम्यान, श्रीमंत व राजकीय व्यक्तींना घरपोच योग्य व दर्जेदार उपचार खासगी डॉक्टरांकडून सहज उपलब्ध होतात, मात्र सामान्य गरीब रुग्णांची मात्र मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत असताना गरीब मात्र अधिक गरीब होत चालला आहे. ग्रामीण रुग्णालयातून गरीब जनतेला चांगले उपचार मिळावेत, यासाठी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व राजकीय नेते प्रयत्नशील दिसत नाहीत, अशी नागरिकांची खंत आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर दोन-चार खासगी दवाखान्यांमध्ये तुलनेने कमी खर्चात चांगले उपचार मिळत असले तरी अनेक ठिकाणी लहान मुले व वृद्धांना योग्य उपचार न मिळाल्याने त्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, वणीतील खासगी डॉक्टरांकडून दिलेले रिपोर्ट्स वरोरा व चंद्रपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर सरळ फेकून देतात आणि नव्याने उपचार सुरू करतात. यावरून स्थानिक उपचारपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तसेच, वणी शहरात दर आठवड्याला व महिन्याला बाहेरील जिल्ह्यातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर येऊन रुग्ण तपासतात. यामुळे स्थानिक डॉक्टरांवरील जनतेचा विश्वास आणखी कमी होत चालला आहे.
वेगळेपण काय?
सर्वसामान्य माणसाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मूलभूत सुविधा नाहीत. ओपीडीसाठी ट्रॉमा केअरकडे जाणारा रस्ता खड्यांनी भरलेला, उपचार साहित्य व सुविधा अपुरी, परिसरात अस्वच्छता, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव अशा अनेक अडचणी कायम आहेत. परिणामी नागरिक सरकारी रुग्णालयाकडे पाठ फिरवून खासगी दवाखान्यांचा मार्ग धरतात.
मात्र महागडे उपचार सर्वांना परवडत नाहीत. त्यातच कट-प्रॅक्टिसचे प्रकार सर्रास होत असल्याने खासगी रुग्णालयावरील विश्वासही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.
आरोग्य विभागाकडून तपासणी व कारवाईचा अभाव असल्यानेच बोगस डॉक्टरांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.

