▪️देवाभाऊंना भाजपा वणी विधानसभा तर्फे धन्यवाद..

वणी (प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने आजवरची सर्वात मोठी मदत म्हणून तब्बल ₹३१,६२८ कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या मदतीत यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी-जामणी आणि मारेगाव तालुक्यांचा समावेश असून, शेतकरी बांधवांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
या मदतीनुसार —
▪️ कोरडवाहू शेतकऱ्यांना ₹१८,५००,
▪️ हंगामी बागायतींना ₹२७,०००,
▪️ बागायती शेतकऱ्यांना ₹३२,५०० प्रति हेक्टर अशी मदत मिळणार आहे.
यासाठी ६५ मिमी पावसाची अट रद्द करण्यात आली असून, मदतीची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टरपर्यंत वाढवली आहे.
तसेच विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹१७,००० अतिरीक्त मदत, तर जमीन खरडल्यास ₹४७,००० रोख अनुदान व नरेगा अंतर्गत ₹३ लाख, अशी एकूण ₹३.५ लाखांची मदत देण्यात येणार आहे.
जनावरांचे, घरांचे व विहिरींचे नुकसान झालेल्यांनाही शासनाकडून रोख भरपाई, तसेच मृत्यू किंवा अपंगत्व झालेल्या व्यक्तींना शासन नियमांनुसार ₹४ लाखांपर्यंत मदत मिळणार आहे.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹१०,००० खत-बियाणे मदत थेट खात्यात जमा केली जाणार असून, पिककर्ज वसुली स्थगिती, विजबिल माफी, शाळा व परिक्षा शुल्क माफी यांसह अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिनांक १० ऑक्टोबर रोजी वणी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) व महाराष्ट्रातील महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
पत्रकार परिषदेस भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
