
वणी (प्रतिनिधी): वणी नगरपालिकेच्या मतदारयादीत मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी केला आहे. नगरपालिकेची प्रभागरचना बदलूनही मतदारयादी अद्ययावत करण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी करत पालिका प्रशासनावर षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
दि. १२ ऑक्टोबर रोजी मनसे कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अंकुश बोढे यांनी सांगितले की, वणी नगरपालिकेच्या २०२५ च्या निवडणुकीसाठी नवीन प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयादीत आवश्यक बदल करणे अपेक्षित होते. मात्र, पालिका प्रशासनाने जुनीच यादी वापरल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त होत आहे.
बोढे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत मतदारयादीत अनेक ठिकाणी विसंगती आढळत आहे. अनेक मतदार एका प्रभागात वास्तव्यास असूनही त्यांची नावे दुसऱ्या प्रभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. हा प्रकार नागरिकांना मतदारयादीच्या घोळात गुंतवून ठेवण्याचा असून, यामागे पालिकेचा मनमानी कारभार लपविण्याचा हेतू असल्याचा त्यांनी आरोप केला.
मतदारांना १३ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप घेण्याची मुदत देण्यात आली आहे. परंतु या गोंधळाचा तातडीने निपटारा न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अंकुश बोढे यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
