
वणी (प्रतिनिधी): वणी-वरोरा रोडवरील एका बारसमोर एका युवकावर आठ ते दहा युवकांनी जीव घेण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन परिसरापर्यंत हल्ला केला. त्यानंतर काही दिवसांतच मोठे गुन्हे दाखल असलेल्या एका व्यक्तीवर १५ ते २० युवकांनी हल्ला करून त्याला जखमी केले, मात्र जखमी व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली नाही.
दरम्यान, शहरात खूनाच्या सलग घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भालर मार्गावरील जी.एस. ऑईल मिल मधील पाण्याच्या टाकीत एका युवकाचा खून करून मृतदेह टाकण्यात आला होता. त्यानंतर, दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वडगांव रोडवरील गजानन नगरी लेआऊट परिसरात आणखी एका युवकाचा खून झाल्याचे उघडकीस आले.
गळा चिरून व डोक्यावर वार करून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, मृताचे नाव अजय किशोर राऊत (वय २८, रा. रंगनाथ नगर, वणी) असे आहे.
शहरात वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिक चिंतित असून, अनेक निर्जन भागांमध्ये पोलिस गस्त नसल्याची चर्चा आहे.
वणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या कार्यकाळात शहरातील वातावरण नियंत्रणात होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी यश मिळवले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा “जैसे थे” परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
शहरातील काही दारू दुकाने मध्यरात्रीनंतरही नियमबाह्यपणे सुरू असल्याची, तसेच गांजाची खुलेआम विक्री होत असल्याची तक्रारी नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
अवैध धंद्यांवर कारवाई आणि निर्जन भागात पोलिस गस्त वाढवली, तर गुन्हेगारीवर काही प्रमाणात आळा बसू शकतो, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सध्या शहरातील वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत आहेत, आणि आता वणीचे ठाणेदार शहर पुन्हा शांततेच्या मार्गावर आणतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
