
वणी (प्रतिनिधी): वणी निर्गुडा पुलाजवळ तसेच चारगाव–शिरपूर मार्गावरील नदी पुलावर मोठे आणि जीवघेणे खडे पडले असून, त्यामुळे वाहनधारकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या मार्गाने दररोज विद्यार्थी, शासकीय कर्मचारी तसेच नागरिक मोटरसायकलने प्रवास करतात. गणेशपूर परिसरातील छोरिया लेआउटसह अनेक गावांना जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पुलावर पडलेल्या मोठ्या खड्यांमुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चारगाव नदी पुलावरसुद्धा अशीच अवस्था असून, हा मार्ग थेट चंद्रपूर जिल्ह्याशी जोडला गेल्याने या मार्गावर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, शिरपूरमार्गे येणारे ओव्हरलोड ट्रक पूल उतारात गिअर न्यूट्रल करून चालवतात. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वाढते.
स्थानिक व ग्रामीण नागरिकांनी तातडीने पुलावरील खड्यांमध्ये मुरूम किंवा गिट्टी टाकून रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नदी पुलाचे मोठे नुकसान होण्याच्या मार्गावर त्याकरिता संबंधित विभागीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांनी तातडीने या मार्गाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

