▪️“शिवसेनेला संधी द्या, समस्या सोडवू” — विजय चोरडिया

वणी (प्रतिनिधी): दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ९ वाजता प्रभाग क्र. ५ दामले नगर परिसरात शिवसेना (शिंदे गट) तर्फे भव्य आणि उत्साहपूर्ण कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. दलित वस्तीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर सभेत सविस्तर चर्चा होऊन नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सभेत बोलताना संदीप खोब्रागडे यांनी, “२२ वर्षांपासून दामले नगरातील विकासकामे ठप्प आहेत. आम्हाला संधी दिल्यास सर्व प्रश्न मार्गी लावू,” असे ठाम विधान केले. परिसरातील मूलभूत सुविधांची अडचण, रस्ते, गटारे व पाणीपुरवठ्याच्या तक्रारी यावर त्यांनी तीव्र भूमिका व्यक्त केली.

गीता पडोळे यांनी महिलांच्या समस्या अधोरेखित करत सांगितले की, “मी काही दिवस वार्डात फिरत आहे. पाण्यासाठी महिलांना पैसे मोजावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पाणी, रस्ते, गटारे यांच्या समस्या शिवसेनेला निवडून दिल्यास प्राधान्याने सोडवू.”
निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले संदीप खोब्रागडे, गीता पडोळे तसेच नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार पायल तोडसाम यांनी प्रभागातील प्रलंबित कामे, नवे विकास आराखडे आणि भावी योजना याबाबत सविस्तर भाष्य केले. नागरिकांनी तिन्ही उमेदवारांच्या वक्तव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास जिल्हा संयोजक विजय चोरडिया, विनोद मोहितकर, महावीर कटारिया, मनीष सुरावार, राहुल मुंजेकर, कुणाल चोरडिया, आशिष गुप्ता, प्रकाश पडोळे, बंटी ठाकूर, सचिन देशपांडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

वार्डाचे प्रमुख व माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे यांनी सभेतून गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. “वार्डातील पाण्याची बोरसुविधा बंद आहे. सार्वजनिक शौचालयही दुरुस्त नाही,” असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी आपल्या कार्यकाळातील आखाड्याच्या जागेवरील शेड बांधकामाची मागणी पुढे रेटली.

२०१६ मध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यानंतरही दलित वस्तीत विकासकामे दुर्लक्षित राहिल्याचा मुद्दा उपस्थित करत अॅड. कुणाल चोरडिया यांनी थेट सवाल केला—“समस्या सुटल्या काय?”

या निवडणुकीचे मतदान दि.२ डिसेंबर रोजी होणार आहे, “या वेळी शिवसेनेला बहुमत दिल्यास प्रभागातील सर्व प्रलंबित समस्या प्राधान्याने सोडवू,” असे आश्वासन विजय चोरडिया यांनी व्यक्त केले.
सभा रात्री ११ वाजेपर्यंत उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सांगता शिवसेना आणि विजय चोरडिया यांच्या जोरदार जयघोषात झाली.
