▪️ डॉ. संचिता नगराळेंच्या सभांत जनसमुदाय उसळला..

वणी (प्रतिनिधी): आज वणीत सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणीटंचाई. दर चार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आणि मध्यरात्री उठूनही नळाला पाणी न येण्याचे हाल आम्ही संपवणार आहोत. नगराध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम वणीकरांचा पाणीप्रश्न सोडवणार,अशी ठाम भूमिका शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता विजयराव नगराळे यांनी मांडली. त्या प्रभाग क्रमांक 2 व 8 मधील कॉर्नर सभेत बोलत होत्या.
डॉ. नगराळे यांच्या सभांना व रॅलींना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, महाविकास आघाडीने नगरपरिषदेच्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. उच्चशिक्षित, समस्यांची जाण असलेल्या उमेदवार म्हणून मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी रात्री गुरुनगर येथे आयोजित कॉर्नर सभेत प्रभाग 2 मधील उमेदवार ज्योत्स्ना बालाजी धोटे, राजू किसन तुराणकर, तसेच प्रभाग 8 चे उमेदवार सुधीर रिमदेव थेरे आणि काँग्रेसच्या सारिका पवन सिद्धमशेट्टीवार यांच्या प्रचारार्थ कार्यक्रम संपन्न झाला.
सभेत मनसे नेते राजू उंबरकर यांनी भाजपच्या “भ्रष्ट कारभारावर” जोरदार टीका केली. “विकासाचा फुगा फुगवणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात कोणतेही दर्जेदार काम केले नाही. भ्रष्टाचार हाच भाजपचा विकास झाला आहे,” अशी टीका त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात आमदार संजय देरकर म्हणाले, “रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही. भाजपच्या कामाचा दर्जा निकृष्ट असून अवघ्या वर्षात रस्ते उखडत आहेत. करवाढ करून भाजपने वणीकरांवर भार टाकला. आता त्यांना खाली बसवण्याची वेळ आली आहे.”
प्रभाग 2 चे उमेदवार राजू तुराणकर यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेत नागरिकांच्या प्रश्नांसाठी यापुढेही तत्परतेने धावून जाईन, असे आश्वासन दिले. तर सुधीर थेरे यांनी स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याचे वचन दिले.
सभेत डॉ. महेंद्र लोढा, आशिष खुलसंगे, सुनिल कातकडे यांनीही भाजपवर जोरदार प्रहार केला.
कार्यक्रमास शिवसेना (उबाठा), काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय निखाडे, दिपक कोकास, गणपत लेडांगे, फाल्गुन गोहोकार, प्रकाश मॅकलवार, अजिंक्य शेंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
