
वणी (प्रतिनिधी): वणी शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याची घोषणा वणी नगरपालिकेकडून करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक ५ मधील दामले फैल परिसरात तीन ते चार दिवसाआडच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एका बाजूला नागरिकांना मार्चपूर्वी नळकर व घरपट्टी भरण्याचे आवाहन करून अन्यथा मालमत्ता जप्त करण्याचा इशारा दिला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला नियमित कर भरणाऱ्या नळधारकांनाही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जलपुरवठा सभापतींनी शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याचे जाहीर केले होते. मात्र दामले फैल परिसरात ही घोषणा केवळ कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दि. १० व १४ फेब्रुवारी रोजी नळधारकांना केवळ २५ ते ३० मिनिटेच पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच दि. १८ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा झाला असला, तरी त्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित कर भरणाऱ्या नळधारकांची उघड लूट सुरू असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. पाणी परस्पर पूर्ण मिळत नसल्याने स्थानिकांनी नाराजी वेक्त केली आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ५ मधील दामले फैल येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या निराकरणासाठी नवीन ट्यूबवेल बोरच्या कामाचे भूमिपूजन दि. १४ जानेवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले होते. दामले नगर हा मागासवर्गीय वस्तीत समाविष्ट परिसर असल्याने पाणीटंचाई दूर करण्यासाठी या कामास प्राधान्य देण्यात आले होते. मात्र संबंधित ठिकाणी पाण्याची पातळी न मिळाल्याने हे काम निष्फळ ठरल्या गेल्याने अनेक रहवास्यांनी नाराजी वेक्त केली होती.
या वार्डात अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव असून सार्वजनिक बोरवेलमध्ये पाण्याची पातळी उपलब्ध असतानाही ती बंद अवस्थेत असल्याने गरीब नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

काहींना पाणी विकत घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागात जाऊन गळती असलेल्या पाइपलाइनमधून पाणी आणण्याची वेळ सुरु आहे.
ही समस्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून उन्हाळ्यातील सोडा पावसाळ्यात, हिवाळ्यातही हिच समस्या आहे. मागील चार वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने नगरपरिषदेचा कारभार प्रशासकीय पातळीवरच सुरू होता. त्याकाळात पाणी गळती पाइपलाइनच्या नावावर खोटे बिले काढल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आता जलपुरवठा सभापती व संबंधित नगरसेवक पाणीपुरवठा कंत्राटदारावर कोणती कारवाई करणार आणि या समस्येवर ठोस उपाययोजना केव्हा करणार, याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.

