Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • महाराष्ट्र आर्थिक संकटात; राज्यावर 12 लाख कोटींपेक्षा अधिक आर्थिक बोजा – ॲड. वामनराव चटप
  • विदर्भ
  • वणी

महाराष्ट्र आर्थिक संकटात; राज्यावर 12 लाख कोटींपेक्षा अधिक आर्थिक बोजा – ॲड. वामनराव चटप

NewWaniDiary 25/06/2026

▪️ माहिती अधिकारातून धक्कादायक आकडेवारी समोर
▪️ “विकास झाला तर कोणाचा?” – विदर्भ राज्य आंदोलन समितीचा सवाल

वणी (दत्तात्रय भा. बोबडे): महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून महसुली उत्पन्नापेक्षा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून विकासाचा लाभ नेमका कोणाला होत आहे, असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रणेते तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी उपस्थित केला आहे.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्याचे आर्थिक संकट वाढत असून “आमदानी अठन्नी, खर्चा रुपया” या म्हणीप्रमाणे राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन सुरू असल्याचा आरोप ॲड. चटप यांनी केला आहे. महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने कर्जाचा बोजा सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे महसुली उत्पन्न ₹6,16,099 कोटी असून वार्षिक खर्च ₹6,56,659 कोटी आहे. अर्थसंकल्पीय तूट ₹40,552 कोटी तर राजकोषीय तूट ₹1,50,491 कोटी इतकी आहे. राज्याचा एकूण खर्च ₹7,69,467 कोटी असून राज्यावरील एकूण कर्ज ₹11,02,654 कोटींवर पोहोचले आहे. या कर्जावर दरवर्षी ₹64,659 कोटी इतके व्याज द्यावे लागत आहे.

याशिवाय विविध विभागांतील कंत्राटदारांची प्रलंबित देणी सुमारे ₹96,400 कोटी असल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची ₹29 हजार कोटी, जलसंपदा विभागाची ₹9 हजार कोटी, जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ₹35,500 कोटी, ग्रामविकास व जलसंधारण विभागाची ₹6,500 कोटी, पर्यटन विकास महामंडळाची ₹3,800 कोटी, नगरविकास विभागाची ₹2,100 कोटी तसेच जिल्हा नियोजन समिती व इतर विभागांची ₹11 हजार कोटी देणी प्रलंबित आहेत.

राज्यावरील कर्ज, व्याजाचा बोजा आणि प्रलंबित देणी विचारात घेतल्यास महाराष्ट्रावर सुमारे ₹12,03,713 कोटींचे आर्थिक दायित्व असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही परिस्थिती चिंताजनक असून सामान्य नागरिकांवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे ॲड. चटप यांनी नमूद केले.

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने “मिशन 2027” अंतर्गत जनजागृतीचे आवाहन करण्यात आले. “मरण समोर असताना लढणे हा स्वभाव बनवा” असे आवाहन करत विदर्भ राज्य निर्मितीसाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन ॲड. वामनराव चटप यांनी केले.

“लढ तरुणा लढ… विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे” असा घोषही त्यांनी यावेळी दिला.

Continue Reading

Previous: HTBT कापूस बियाण्यावरील बंदीविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलन; खडकी येथे प्रतिबंधित बियाण्याची प्रतिकात्मक लागवड
Next: दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.