
मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव शहरात मागील दोन ते तीन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दिनांक १३ ऑगस्ट रोजी मारेगाव शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने उपविभागीय अभियंता, महावितरण, मारेगाव यांच्या मार्फत अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), पांढरकवडा यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
मारेगाव शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी शहरात येणारे नागरिक, विद्यार्थी तसेच बँकांमध्ये कामासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारक यांना वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बँका व शासकीय कार्यालयांमध्ये बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यांची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. विद्यार्थी, शेतकरी, मजूर व ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचेही दैनंदिन कामकाज विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा खंडित होणे तसेच अचानक वीज येणे-जाणे यामुळे घरगुती व कार्यालयीन विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. वातावरण अनुकूल असो किंवा प्रतिकूल, कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
त्यामुळे मारेगाव शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सात दिवसांचा अल्टिमेटम
निवेदन प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत मारेगाव शहरातील वीजपुरवठा नियमित व सुरळीत न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मारेगाव शहरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन नियमित, सुरळीत व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना अजय एस. रायपुरे, पूनम ए. रायपुरे, नागेश वि. मडावी, प्रवीण एम. आत्राम, राजेश डी. पोटे यांच्यासह मारेगाव शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
