
वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील दलित वस्ती अंतर्गत येणाऱ्या दामले नगर परिसराच्या वार्डातील सार्वजनिक शौचालये दीर्घकाळापासून दुरुस्तीसाठी बंद असून, विहाराजवळील पाण्याचे बोअरही बंद पडले आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, काहींना तर चिकलगाव ग्रामीण भागात जाऊन लिकेज पाईपलाइनमधून पाणी भरावे लागत आहे.
मात्र, नागरिकांचे म्हणणे आहे की “लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित विकास कामे झाली नाहीत.” त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत स्थानिक नागरिक “आपल्या वार्डातील जबाबदार व्यक्तीला संधी द्यावी” अशा विचारात आहेत.
वार्डातील समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही काहीही सकारात्मक हालचाल झालेली नाही. अनेक जबाबदार नागरिकांनी पालिकेकडे निवेदने दिली, पाठपुरावा केला, पण तरीही समस्या कायम आहेत.
परिसरात सध्या हीच चर्चा रंगली आहे की, “आपल्या वार्डात अनेक वर्षांपासून विकास झाला नाही; आता नागरिकांनी बदलाचा निर्णय घ्यावा.”
