
वणी – बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाला मिळावा यासाठी दि. ४ मार्च रोजी वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
महाबोधी महाविहार हे जगातील सर्व बौद्धांचे श्रद्धास्थान असूनही अनेक वर्षांपासून गैर-बौद्धांच्या ताब्यात आहे. यामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक अस्मितेवर घाला घातला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बुद्धगया मंदिर कायदा, १९४९ नुसार, महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती असते, ज्यामध्ये पाच हिंदू आणि चार बौद्ध सदस्य असतात. तसेच, गया जिल्हाधिकाऱ्यालाच अध्यक्षपद दिले जाते आणि तो हिंदू असणे बंधनकारक आहे. यामुळे बौद्ध समाजाला त्यांच्या धार्मिक स्थळावरील निर्णय प्रक्रियेत संपूर्णतः वंचित ठेवले जाते.
यामुळे, हा कायदा तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाला द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी प्रशांत गाडगे, शिवाजी दुपारे, बंडू गणवीर, शिवकुमार कुशवाह, चंद्रकांत उपरे, राहुल कोलते, चंदू मेश्राम, करण मेश्राम, इंद्रपाल वाघ, सुरज वानखेडे, नरेंद्र वाळके, दत्ताप्रभु मत्ते, संगम खोब्रागडे, भाऊराव मजगवळी, कांचन सिडाम, दीपक खोब्रागडे, अतुल मेडपल्लिवार, मंगल मडावी, शाकीर शेख, नरेंद्र गेडाम, आतिश तुमराम आणि अनेक समाजबांधव उपस्थित होते.

