
वणी (प्रतिनिधी) : दि. ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास सावर्ला गावच्या शिवारात ट्रक हायवा क्रमांक MH40M 6670 मधून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाड टाकून वाहन जप्त केले. पंचनामा करून तस्करीचा प्रकार उघड करण्यात आला.
सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, आवश्यक ती कायदेशीर कारवाई वेळेत न झाल्याने हा प्रकार वाळू माफियाला पाठीशी घालणारा ठरत असल्याचा आरोप अर्जदार रविंद्र धर्मराव कांबळे यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी दि. २३ एप्रिल २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी, वणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र ठोस कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज दि. १२ सप्टेंबर रोजी सादर केला आहे. तसेच, मंडळ अधिकारी जयंत झाडे व तलाठी कुणाल आडे यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.
अर्जदार याआधी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर कारवाई घडवून आणलेली आहे. आता वाळू तस्करी प्रकरणात प्रशासनाकडून उशीर झालेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासन सतत नवे व कठोर नियम लागू करत असताना स्थानिक स्तरावर झालेला हा विलंब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे.
या प्रकरणात पुढील कार्यवाही काय होते, याकडे संपूर्ण वणी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
