
वणी (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांचे कामकाज गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाले असून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमागे अभियांत्रिकी विभागाच्या अभिप्रायातील विलंब हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात अखिल भारतीय CSC महासंघ ई-सेवा व आधार केंद्र संचालक VLE युनियन तर्फे दि.24 जुलै रोजी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. युनियनचे अध्यक्ष अरविंद गायकवाड, सचिव सचिन वाकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तातडीने दखल घेऊन अभिप्राय प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

युनियनच्या म्हणण्यानुसार, “अभिप्राय न मिळाल्याने आपले सरकार सेवा केंद्रांतून मिळणाऱ्या महत्त्वाच्या सेवा बंद आहेत. यामुळे नागरिकांना प्रमाणपत्रे, जमीन नोंदणीसह अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत.”
युनियनने प्रशासनास इशारा दिला आहे की, जर ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
