
गडचांदूर (ता. कोरपना) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तालुका कोरपना शाखेची बैठक दिनांक २७ जुलै २०२५ रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे प्राचार्य रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत पक्षाने निर्णय घेतला की, जिथे शक्य होईल तिथे समविचारी पक्षांशी युती अथवा आघाडी करून निवडणुका लढवायच्या आणि जिथे युती शक्य नसेल तिथे स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूक लढवायची. हा ठराव एकमताने मंजूर झाला.
बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना सोलापूर येथील राष्ट्रीय अधिवेशनातील ठरावांची माहिती देण्यात आली. सभासद नोंदणीसाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचे आणि शुल्क फक्त चेक अथवा डीडीद्वारेच स्वीकारायचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, समता सैनिक दलाला पक्षाशी पुन्हा संलग्न केल्याचे जाहीर करत गावागावात त्यांच्या शाखा स्थापनेचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांची गोडी निर्माण करण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या शाखा स्थापन करण्याचेही ठरवण्यात आले.
बैठकीस अशोककुमार उमरे, भंते कश्यप, प्रा. भानुदास पाटील, चिंतामण घुले, ईश्वर आत्राम, जगदीश धवने, नेमीचंद कातकर, भिमराव भगत, प्रकाश कवाडे, शिवाजी धुपे, वारलूजी नळे, सुरजभाऊ उपरे, अनंताभाऊ रामटेके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक व संचालन अशोककुमार उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ईश्वर आत्राम यांनी केले. बैठकीचे औचित्य साधून ऐतिहासिक बुद्धभूमी येथे शिवाजी धुपे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणही करण्यात आले.
