
गडचांदूर (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड आणि षडयंत्रकारी हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर) यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य निषेध सभा घेण्यात आली.
सभेचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश पाटील (रिपब्लिकन) होते. प्रमुख उपस्थितीत गोपाळ रायपूरे (माजी जिल्हाध्यक्ष रिपाइं), भंते कश्यप, ऍड. प्रियंका चव्हाण, कोमल रामटेके, गुरूदास रामटेके, अजय चव्हाण, मधुकर चुनारकर, दशरथ डांगे, संतोष निखाडे, हरिदास गौरकार यांच्यासह विविध सामाजिक व आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सभेत सर्व वक्त्यांनी सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला म्हणजे भारतीय संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला असल्याचे ठामपणे सांगितले. अशा षडयंत्रकारी व जातीय प्रवृत्तींविरुद्ध समाजाने सजग राहून संविधान रक्षणासाठी एकसंघ संघटनशक्ती उभारण्याचे आवाहन करण्यात आले.
सभेच्या शेवटी “भारतीय संविधानाचा विजय असो! जय भीम! डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर राहो!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे संचालन अशोककुमार उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरजभाऊ उपरे (जिल्हा युवा अध्यक्ष, रिपाइं) यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत सामाजिक कार्यकर्ते दादा पाटील गोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
