
वणी (प्रतिनिधी): झरी-जामणी तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजावरून निर्माण झालेला वाद आता राजकीय वळण घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायत सदस्य बबीता पंकज मुददमवार यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची जिल्हा स्तरावर दखल घेण्यात आली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने अनेक वेळा पत्रव्यवहार व सुनावण्या पार पडल्यावर जिल्हा परिषद, यवतमाळ अंतर्गत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कामकाजाची सखोल पडताळणी करणे अपेक्षित होते.
तपासणीदरम्यान सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना आवश्यक अभिलेखांसह उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच कोणतीही अनुपस्थिती होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचे निर्देश दिले होते.
मात्र, तपासणी प्रक्रियेदरम्यान राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. या दबावामुळे अपेक्षित त्या पातळीवर सखोल चौकशी होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. परिणामी, संपूर्ण तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि चौकशी खरोखरच निष्पक्ष व पारदर्शक होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. चौकशी पारदर्शक न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.


