▪️प्रलंबित मागण्यांसाठी लाँग मार्चचा इशारा..

वणी (प्रतिनिधी): शासन व प्रशासनाच्या आरोग्य सेवेतील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडताना जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांचे अल्प मानधनावर प्रचंड शोषण होत असल्याचा आरोप करत, “आशा कर्मचाऱ्यांना सहा-सहा महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने त्यांच्या जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,” असे रोखठोक प्रतिपादन सीटू आशा संघटनेचे चंद्रपूर जिल्हा सचिव कॉ. अरुण भेलके यांनी केले.
वणी येथील वसंत जिनिंग सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित सीटू आशा संघटनेच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कॉ. प्रिती करमणकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे सीटू आशा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. ॲड. कुमार मोहरमपूरी, कॉ. अरुण भेलके, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे, कॉ. सरिता दानव, कॉ. परशुराम तोडासे उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, आशा कर्मचारी युनियन (लाल बावटा) आणि अंशकालीन परिचर संघटनेच्या वतीने दि. १९ ते २२ एप्रिल दरम्यान तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय असा लाँग मार्च आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या लाँग मार्चमध्ये वणी तालुक्यातील शेकडो आशा कर्मचारी सहभागी होऊन सुमारे १०० किमी पायी चालत आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.

🔴 प्रमुख मागण्या:
- दर महिन्याच्या १ तारखेला नियमित मानधन व वेतनचिठ्ठी द्यावी
- मागील तीन वर्षांपासून रखडलेला विविध सर्वेक्षणांचा मोबदला तात्काळ द्यावा
- कोरोना काळातील कामाचा २४ महिन्यांचा २४ हजार रुपये मोबदला देण्यात यावा
- मंजूर ग्रॅज्युइटीची अंमलबजावणी करावी
- सहा महिन्यांपासून थकलेले वेतन तातडीने अदा करावे
- कोणताही शासन निर्णय नसताना जबरदस्तीने बीएलओचे काम देऊ नये
या लाँग मार्चमध्ये शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या विविध मागण्यांचाही समावेश असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यशाळेचे संचालन कॉ. मीनाक्षी थेरे यांनी केले. प्रास्ताविक कॉ. उषा मुरखे यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉ. ताई डोंगरे यांनी केले. कार्यशाळेला वणी तालुक्यातील अनेक आशा कर्मचारी उपस्थित होत्या.

