
वणी (प्रतिनिधी) : नवीन अमृत योजनेअंतर्गत वणी शहरात प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वॉटर वर्क्स परिसरातील सुमारे २१ ते ३० वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) तसेच न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशन, वणी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात नगर परिषद वणीचे मुख्याधिकारी सचिन गाडे तसेच नगराध्यक्ष विद्या आत्राम यांना निवेदन व आक्षेप अर्ज सादर करण्यात आला.
नवीन अमृत योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वॉटर सप्लायच्या विद्यमान जागेची निवड करण्यात आली आहे. मात्र या परिसरात अनेक वर्षांपासून पर्यावरणाचा समतोल राखणारे, नागरिकांना सावली देणारे तसेच शहराच्या हरित वारशाचे प्रतीक असलेले मोठ्या प्रमाणात वृक्ष अस्तित्वात आहेत. या वृक्षांची तोड झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडण्याबरोबरच शहराच्या नैसर्गिक सौंदर्याला आणि हरित वारशाला मोठा धक्का बसेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विकासकामे महत्त्वाची असली तरी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे दोन्ही संघटनांनी स्पष्ट केले. जलशुद्धीकरण केंद्रासाठी सध्याची जागा न वापरता नगर परिषद हद्दीतील उपलब्ध मोकळ्या जागांचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या इतर जागांवर हा प्रकल्प उभारण्याची शक्यता तपासावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, गेल्या काही वर्षांत विकासकामांच्या नावाखाली शहरातील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. अनेक रस्त्यांच्या कामांदरम्यान सावली देणारी आणि पर्यावरणासाठी उपयुक्त असलेली वृक्षसंपदा नष्ट करण्यात आली. शहरातील सिमेंट रस्त्यांचे प्रमाण वाढल्याने उष्णतेत लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत.
स्थानिक नागरिकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, विकासकामांसाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात संबंधित लोकप्रतिनिधी, विभागीय अधिकारी व कंत्राटदारांनी अद्याप अपेक्षित प्रमाणात वृक्षलागवड केलेली नाही. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. काही विकासकामांच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी नमूद केले.
वणी शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांच्या भावना लक्षात घेऊन वृक्षतोडीचा निर्णय पुनर्विचारासाठी स्थगित करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच या आक्षेपावर अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही वृक्षतोड करू नये व पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करून विकासकामे राबवावीत, अशी विनंती मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) आणि न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशन, वणी यांच्या वतीने करण्यात आली आहे.


वृक्षतोडीच्या प्रस्तावाविरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) व न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशन, वणी यांच्या वतीने नगराध्यक्ष विद्या आत्राम व मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निवेदन सादर करताना पदाधिकारी.
