▪️ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वणीत निषेध; विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा..

वणी प्रतिनिधी : पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील अनेक भागांत आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांकडून शांततापूर्ण आंदोलन सुरू असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या आंदोलनाला अनेक राज्यांतून पाठिंबा मिळत असून विविध ठिकाणी निषेध आंदोलने, धरणे आणि निवेदने देण्यात येत आहेत. आंदोलनस्थळी काही राजकीय नेत्यांनीही भेट दिल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दि. २० जुलै २०२६ रोजी वणी येथे सर्वपक्षीय राजकीय पक्ष, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांना निवेदन देण्यात आले. तसेच विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागांतही आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला.
आंदोलकांचे म्हणणे आहे की, लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचा तसेच काही पत्रकारांनाही मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. काही पोस्टमध्ये महिला आंदोलकांशी गैरवर्तन झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
दरम्यान, अरुणाचलप्रदेश, बिहारमधील पाटणा तसेच इतर राज्यांमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि इतर अनेक ठिकाणी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात येत असून, पेपर लीक प्रकरणावर तातडीने कारवाई करून जबाबदारांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
पेपर लीक प्रकरण आणि त्यासंदर्भातील आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याच्या अधिकाराबाबत देशभरात व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

