
वणी(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषि अधिकारी कार्यालय वणी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत दिनांक 31 जुलै रोजी, वसंत जिंनिग सभागृह वणी येथे शेतकरी किसान गोष्टी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्रात फळबाग लागवड व व्यवस्थापन आणि खरीप हंगामातील मुख्य पिकांचे कीड व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वणीचे तालुका कृषि अधिकारी दिलीप राऊत यांनी केले व प्रास्ताविकामध्ये कृषि विभागाच्या विविध योजना, रासायनिक कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी, शेतीला पारपारिक पिकासह, फळबाग लागवड, बांबू लागवड व रेशीम शेती करण्याचे आवाहन उपस्थित शेतकर्याना केले.

सहायक प्राध्यापक उद्यानविद्या अंजली गहरवार यांनी वणी तालुक्याच्या शेत जमिनीस योग्य असणारे फळपिक संत्रा, आंबा, पेरू, चिकू, पपई व केळी पिकांचे लागवड तंत्रज्ञान, योग्य कलमांची निवड, लागवडी पूर्वी माती परीक्षण करणे या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वणी तालुक्यातील वरझडी गावातील प्रगतशील शेतकरी राहुल चिडे यांनी त्यांच्या शेतातील पेरू पिकाच्या लागवडीची यशोगाथा उपस्थित शेतकर्यांना सांगितली. कीटकशास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ चे डॉ. प्रमोद मगर यांनी कपाशी, सोयाबीन व तूर पिकावर येणाऱ्या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन व हुमणी अळीचे नियंत्रण कसे करायचे या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वणी धम्मपाल बन्सोड यांनी केले तर आभार सहायक कृषि अधिकारी मुकेश पत्रे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता मंडळ कृषि अधिकारी कायर एम.ए. थेरे, उप कृषि अधिकारी अनंता कन्नाके, सर्व सहायक कृषि अधिकारी व जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमात वणी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
