
वणी : वणी परिसरातून वाहणारी निर्गुडा नदी पूर्णपणे कोरडी पडल्याचे गंभीर चित्र सध्या दिसून येत आहे. नवरगाव धरण परिसरातून उगम पावणारी ही नदी वणी शहरासह अनेक गावांमधून वाहत जाऊन वडजुगाड येथे वर्धा नदीला मिळते. मात्र यंदा ती पूर्णपणे आटल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

निर्गुडा नदी कोरडी पडल्याचा थेट परिणाम शहर व ग्रामीण भागातील भूजल पातळीवर होत असून अनेक ठिकाणी विहिरी, बोअरवेल आणि हातपंपांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, नदीपात्रातील वाढते अतिक्रमण, पाण्याचा अतिवापर, कमी झालेला पाऊस आणि जलसंधारणाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने नदी पुनर्जीवन, खोलीकरण आणि जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

