
वणी – मारेगाव हा यवतमाळ जिल्ह्याचा एक महत्त्वाचा मुख्य मार्ग असून या रस्त्यावर गौराळा गावाजवळ अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना विशेषतः प्रवासी वाहनचालक व गर्भवती महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आटो-रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की, गरोदर महिला रिक्षामध्ये बसवून नेणे सध्या खूपच कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे रिक्षा चालवताना मोठ्या प्रमाणात धक्के बसतात, ज्याचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी या रस्त्याची दुरवस्था इतकी झाली आहे की, कधी कोणत्या वाहनाचा अपघात होईल सांगता येत नाही. सध्या या रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तरीही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून त्यांनी सवाल केला आहे की, “अपघात होऊन जीव गेल्यानंतरच का रस्ता दुरुस्ती होणार?”
प्रशासनाने तात्काळ या मार्गाची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी आणि नागरिकांचे जीव धोक्यात न घालता रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे.
