
वणी (प्रतिनिधी): वणी ग्रामीण रुग्णालयातील दीर्घकालीन समस्या, जसे की औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव व ट्रॉमा केअर सेंटरमधील मूलभूत अडचणी यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. या भेटीनंतर काही तात्पुरते निर्णय घेतले गेले, त्यात ओपीडी सेवा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करणे याचा समावेश होता.
मात्र, या नवीन ठिकाणी जाण्यासाठी रुग्णांना अत्यंत खराब रस्त्याने प्रवास करावा लागत असून, पावसाळ्यात त्या मार्गावर सुमारे तीन फूट पाणी साचत असल्यामुळे रुग्णांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोणताही रुग्ण त्या ठिकाणी अपघातग्रस्त झाल्यास जबाबदारी कोणाची? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

जिल्हाधिकारी येऊन एक आठवडा उलटूनही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर एखादा मंत्री किंवा न्यायाधीश आले असते, तर तात्काळ रस्त्यावर मुरूम टाकून व्यवस्था करण्यात आली असती, अशी टीकाही करण्यात येत आहे.
फक्त मतदानासाठीच नागरिकांची आठवण काढणाऱ्या राजकारणावरही टीकेची झोड उठली आहे. गरिबांच्या मूलभूत आरोग्य सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच असून, लवकरात लवकर पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी सोडवाव्यात आणि रुग्णांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज सुविधा मिळाव्यात, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.
