• बळीराजा व्याख्यानमालेत प्रा. रंगनाथ पठारे यांचे प्रतिपादन.

वणी: सध्याच्या जागतिकीकरण,खाजगीकरण आणि उदारीकरणच्या काळात जनतेच मायबाप असणारं सरकार लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेपासून दूर जातांना दिसत आहे.बहुराष्ट्रीय कंपन्या आपले उत्पादन विकण्यासाठी लोकांच्या नवीन गरजा निर्माण करत आहे.आणि स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला ओरबाडत आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता जीवनाच्या सर्व क्षेत्रात आपले हातपाय पसरू पाहत आहे.अश्या परिस्थितीत निसर्गतः मानवाला लाभलेल्या विचार करण्याच्या ,निर्णय घेण्याच्या,विश्लेषण करण्याच्या मेंदूच्या क्षमतेला माणूस गमवून बसतो की काय? आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्याऱ्या मूठभर लोकांच्या हाती सामान्य माणसाचे नियंत्रण जाऊन नवीन वर्णव्यवस्था उभी राहू पाहते की काय? अश्या मानवी अस्तित्वाच्या ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर जग उभे आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ” ताम्रपटकार ” प्रा.रंगनाथ पठारे यांनी केले.
शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे पहिले स्मृती पुष्प गुंफतांना त्यांनी “सामाजिक वास्तव : काल,आज,आणि उद्या” या विषयावर भाष्य केले.दिवंगत रामचंद्र जागोजी सपाट यांच्या स्मृतीस समर्पित हे व्याख्यान होते.शनिवार दि २८ डिसेंबर सायंकाळी स्थानिक बाजोरिया लॉन येथे संपन्न झालेल्या व्याख्यानाचे अध्यक्षपद समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी भुषविले. समाजव्यवस्थेचा कुटुंब हा गाभा आहे.आणि सध्याच्या अविचारी वातावरणामुळे कुटुंबातील माणूस माणसापासून दूर जात आहे.त्यासाठी माणसाने
माणसाकडे स्वच्छ दृष्टीने बघणे आवश्यक आहे.पुढे मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले की,आपली विचार प्रक्रिया मातृभाषेतून चालू असते. त्यामुळेच मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हृदयापर्यंत पोहोचते.तर अन्य भाषेतील विचार फक्त मेंदूच्या पातळीवरच राहते. मराठी मातृभाषा असणा-या मुलांना इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून दिले जाणारे शिक्षण आकलनाच्या पातळीवर जड होते.त्यासाठी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे.त्यासाठी जगातील सकस ज्ञान तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने अनुवाद विद्यापीठ निर्माण करणे आवश्यक आहे.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतामधुन आयोजन समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी आश्रयदाते आणि श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.तर प्रास्ताविक मनोगतामधुन समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपुत यांनी या व्याख्यानमाले मागील भुमिका व महत्व विशद केले.याप्रसंगी विचारपिठावर ठाणेदार अनिल बेहरानी,मराठा सेवा संघ अध्यक्ष अंबादास वागदरकर,प्राचार्य चंद्रमणी धोटे, प्राचार्य मनोज कारेमोरे,जितेंद्र पाटील,डॉ.राम कात्रे,एड.विजया मांडवकर -शेळकी,वेणुताई कोटरंगे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा प्रारंभ जिजाऊ वंदनेने झाला.तसेच जागतिक अर्थतज्ञ आणि माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांना मौन आदरांजली अर्पण करण्यात आली.पहिल्या दिवशीच्या या व्याख्यानाचे सूत्रसंचालन समितीचे निमंत्रक कृष्णदेव विधाते यांनी तर उपस्थितांचे आभार संदीप ठाकरे यांनी मानले.विचारपीठावरील पाहुण्यांचे स्वागत डॉ.रमेश सपाट,डॉ.सुनिल जुमनाके,प्रा.बाळासाहेब राजुरकर,मंगेश गवळी,शंकर पुनवटकर,सरिता घागे,रंजना जिवतोडे,लक्ष्मण काकडे,रविंद्र आंबटकर,दत्ता डोहे यांनी ग्रंथ भेट देऊन केले.कार्यक्रमाचा समारोप राष्टगिताने झाला.व्याख्यानास वणीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
