
वणी (प्रतिनिधी): भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व जातीअंत संघर्ष समिती यांच्या वतीने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९२७ साली झालेल्या महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त १९ व २० मार्च रोजी महाड येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते महाडकडे रवाना झाले आहेत.
त्या काळात भारतीय समाजात अस्पृश्यता व जातीय भेदभाव अत्यंत तीव्र स्वरूपात अस्तित्वात होता. दलित व वंचित समाजाला सार्वजनिक पाणीस्रोतांचा वापर करण्यास मनाई करण्यात येत होती. या अन्यायकारक व अमानुष प्रथेविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो अनुयायांसह चवदार तळ्यावर जाऊन सामूहिक जलप्राशन करत “पाणी हा आमचा नैसर्गिक हक्क आहे” ही घोषणा प्रत्यक्ष कृतीतून साकारली.
हा जलसत्याग्रह केवळ पाणी पिण्याच्या अधिकारापुरता मर्यादित न राहता, मानवमुक्ती, स्वाभिमान व सामाजिक समानतेसाठीचा ऐतिहासिक टप्पा ठरला. या आंदोलनाने सामाजिक क्रांतीची ठिणगी पेटवली. पुढे २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून जातीय विषमतेविरुद्ध निर्णायक लढा उभारण्यात आला.
या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या मूल्यांना अधोरेखित करण्यासाठी राज्यव्यापी परिषद व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाला माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. एम. ए. बेबी, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, लोकशाहीर संभाजी भगत, आंबेडकरी साहित्यिक प्रज्ञा पवार तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कमिटी सदस्य कॉ. कवडू चांदेकर, कॉ. बादल कोडापे, रमेश ताकसांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.
