▪️नदी बचाव समिती,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह (भाग – २)

वणी (प्रतिनिधी) : निर्गुडा नदीच्या दयनीय अवस्थेबाबत प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात नदीचे कोरडे पडलेले वास्तव, वाढते प्रदूषण आणि नदी संवर्धनाच्या अभावाची स्थिती समोर आली होती. मात्र या गंभीर परिस्थितीसाठी नेमके जबाबदार कोण, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वणी शहराची तहान भागवणारी आणि शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी निर्गुडा नदी आज अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचली आहे. एकेकाळी स्वच्छ, निर्मळ आणि बारमाही वाहणारी ही नदी सध्या पूर्णतः कोरडी पडली असून तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नदी संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी कोणतेही व्यापक आणि प्रभावी प्रयत्न होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्राजवळ नगर परिषदेकडून नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम केवळ मर्यादित क्षेत्रापुरतेच होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नदीमध्ये पाणी टिकून राहण्यासाठी रेल्वे पुलापासून जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईपलाईन बांधपर्यंत संपूर्ण नदीपात्रातील गाळ काढणे तसेच आवश्यक तेथे नदीचे रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी व्यक्त केले आहे.
निर्गुडा नदी काटी काही ग्रामपंचायती लागून असून, महसूल प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील विविध भागांतील तसेच नव्याने विकसित झालेल्या लेआउटमधील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने अनेक ठिकाणी घाणीची डबकी साचली आहेत.

परिणामी दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्या वाढत असून नदीचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे. याशिवाय नदीकाठावरील वृक्षतोडीमुळेही परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.

नागरिकांचा प्रश्न आहे की, अवैध रेती उत्खननावर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग तत्पर असतो, मग नदीचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि स्वच्छतेसाठी अशीच तत्परता का दाखवली जात नाही? संबंधित अधिकारी आणि यंत्रणा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
काही वर्षांपूर्वी निर्गुडा नदी स्वच्छता आणि जनजागृतीसाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. नदी बचाव समितीची स्थापना करून मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. नदी सुधारणा कामांनाही सुरुवात झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून समितीची कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. नदी बचावाच्या नावावर राजकारण करणारे अनेकजण आज या गंभीर विषयावर मौन बाळगत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
“निर्गुडा नदी वाचली तरच भविष्यातील पाणीटंचाई टळू शकते. अन्यथा येणाऱ्या काळात वणीकरांना पिण्याच्या पाण्यासह गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक संकटांना सामोरे जावे लागेल,” अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यामुळे आता “प्रशासन, नदी बचाव समिती आणि लोकप्रतिनिधी गेले कुठे?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात असून निर्गुडा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीच्या कृतीची मागणी जोर धरत आहे.
