
वणी (प्रतिनिधी) – मौजा उकणी ते बोरगाव चौकदरम्यानचा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या कामगार, स्थलांतरित व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपघातांची संख्या वाढली असून, कोळशाच्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पीक उत्पादनात जवळपास ८०% घट झाली असून भविष्यात ही जमीन नापीक होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर उकणी, पिंपळगाव, जुनाड परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी, क्षेत्रीय महाप्रबंधक, भालर वसाहत यांना निवेदन देण्यात आले. सध्या सुरू असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून दर्जेदार काम करून घेण्यात यावे, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
त्याचबरोबर, उकणी गावातील विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच स्कूल बस असून, त्याची क्षमता ६० विद्यार्थ्यांची आहे. प्रत्यक्षात उकाणीसह पिंपळगाव, जुनाड, प्रगती नगर येथील एकूण १०० हून अधिक विद्यार्थी याच बसने प्रवास करतात. विद्यार्थ्यांची भरगच्च गर्दी असलेली ही बस कधीही अपघातास निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
उकणी हे प्रकल्पग्रस्त गाव असल्याने, स्वतंत्र स्कूल बस देणे ही शासनाची जबाबदारी असून, तातडीने स्वतंत्र बसची व्यवस्था करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन संजय खाडे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी सादर केले असून, या निवेदनाची प्रत खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी यवतमाळ, एरिया पर्सनल ऑफिसर (वणी नॉर्थ एरिया), उपक्षेत्रीय प्रबंधक (उकाणी) आणि खान प्रबंधक (उकाणी) यांना देण्यात आली आहे.
