▪️ मागास वस्ती अंतर्गत वार्डातील मूलभूत सुविधांच्या समस्येत वणी नगर परिषद अपयशी..

वणी (प्रतिनिधी): शहरातील दामले फैल मागास वस्ती अंतर्गत येणाऱ्या वार्डामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सार्वजनिक पाण्याच्या सोयी-सुविधा बंद अवस्थेत असून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने गोरगरीब नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून परिसरातील सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शौचालय परिसरातील पाण्याचे बोरदेखील नगरपालिकेकडून बंद ठेवण्यात आले असून त्यास जोडलेली पाईपलाईनही काढण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

चार महिन्यांपूर्वी हनुमान मंदिराजवळ नवीन बोरवेल खोदण्यात आले होते. मात्र अद्याप ते सुरू करण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नवीन बोरवेल तात्काळ सुरू करून नळजोडणीशी जोडल्यास परिसरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दामले फैल हा दलित वस्ती अंतर्गत येणारा वार्ड असून येथे अनेक कुटुंबांना नियमित पाणी मिळत नसल्याने पाणी खरेदी करावे लागत आहे. काही कुटुंबांना दररोज पाणी विकत घेणे परवडत नसल्यामुळे मोठे टँकर बोलविण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत काही सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक स्वतःच्या घरातील बोरवेलमधून शेजाऱ्यांना विनामूल्य पाणी देत असल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे काही ठिकाणी नागरिकांना जादा दराने पाणी विक्री होत असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या आधीही परिसरात यापेक्षा अधिक गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी नागरिकांना वसंत जिनींग कंपनी परिसरातून व निर्गुडा नदीतून पाणी मिळत होते. मात्र जिनींग बंद झाल्यानंतर आणि निर्गुडा नदीचे खोलीकरण झाल्यापासून महिलांचे नदीवर जाऊन पाणी भरणेही बंद झाले. यंदा तर नदी पूर्णपणे आटल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, २०१६ पासून या प्रभागात सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी अपेक्षित विकासकामे केली नाहीत. उलट या भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधा यांसारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीत सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांना सर्वाधिक महत्त्व दिले होते. मात्र आजही मागास वस्त्यांमधील नागरिकांना पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दामले फैल परिसरात दिसून येत आहे.
“लोकशाही ही केवळ सरकारची पद्धत नसून ती समाजात समानता, न्याय आणि बंधुता निर्माण करणारी जीवनपद्धती आहे.”
— B. R. Ambedkar
सध्या वाढत्या उन्हामुळे पाण्याची गरज अधिक वाढली आहे. नवीन बोरवेल सुरू करून वार्डातील नळपाईप लाईनला जोडणी देण्यात यावी तसेच काही गल्लींमध्ये नवीन पाईपलाईन टाकून अधिक गरजू नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून तात्काळ उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
